रोखठोक नाना

नाना पाटेकर वर आपण कितीही जोक मारले.. कितीही जरी त्याची मिमिक्री केली किंवा कितीही चेष्ठा केली तरी त्याच्या अभिनयाबद्दल, त्याच्या कलेबद्दल, त्याच्या बोलण्याबद्दल आणि लिहीण्याबद्दलचं त्याचं जे जिवंत आणि खरोखरी असणं आहे, त्याचा आपल्यावर एक प्रकारचा प्रभाव आहेच. तो प्रभाव आपण नाकारु शकत नाही. मग त्याचं सध्या असलेलं शेतात राहणं असो... आनंदवन ला पैसे द्यायचे होते म्हणून केलेला वेलकम सिनेमा असू दे... राजकारण्यांच्या इव्हेन्ट मध्ये जाउन त्यांच्यावरच तोंडसुख घेण्याचा त्याचा खोडकर स्वभाव असू दे.. त्याची अभिनयची स्वतःची अशी शैली असू दे किंवा त्याचं नुसतंच बोलणं असू दे.. लागबागच्या राजाचं लाईनमध्ये उभं राउन दर्शन घेणं असू दे.. त्याचं सामाजिक भान असू दे किंवा मग त्याचं लिखाण असू दे...
विवेक नावांच एक साप्ताहिक आहे. सुप्रसिद्ध वगैरे म्हणू शकतो आपण त्याला. आमचा छोटा भाउ त्या साप्ताहिकात असल्यामुळे त्या साप्ताहिकाबद्दल आम्हाला थोडीफार आस्था. या सात्पाहिकासाठी नाना पाटेकर ने एक लेख लिहीला होता. निमित्त होतं गुरुपौर्णिमेच. लेख छापून येण्याआधीच नाना चा लेख येणार आहे हे कळालेलं. आमचा छोटा भाउ ..विवेक चा लॉयल एम्पॉयी प्रविण दाभोळकर ने लेखाची प्रचंड तारीफ केली होती. नाना ने स्वतःच्या हस्ताक्षरात लेख ऑफिसात लिहून पाठवलेला.. त्याचं अक्षर इतंक अप्रितम... प्रविण त्या लेखाची भरपूर तारीफ करत होता..साहजिकच त्यामुळे लेखाबद्दलची माझी कुतूहलता वाढत गेली.
गुरुपौर्णिमेचा अंक आला.. पण अंक काही विकत घेता आला नाही. शेवटी विवेक च्या ऑनलाईन साईटची लिंक प्रविण कडून मिळाली. ह्या वेळच्या गुरुपौर्णिमेच्या अंकात नागराज चा शब्दांकन केलेला लेख होता. खुप दिग्गज लोकांना लिहीत केलेलं विवेक ने गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून. पण त्या सगळ्या लेखांपैकी नानाचा लेखंच खतरनाक होता.
प्रविण ने सांगितलेल्या आणि तारिफ केलेल्याच्या मानाने लेख सुपरडुप्पर भारी होता. नाना सारखी माणसंच असं काहीतरी लिहू शकतात, बोलू शकतात. बेधडक. आरपार. नाना चा लेख इतका आवडला की तो ब्लॉग वर संग्रहिती करुन ठेवावासा वाटला.. म्हणून...
बाकी मुळ हक्क विवेक ला स्वाधीन आहेत... नाना त-हेच लिखाण या माध्यमातून माझ्या मित्रांपर्यंत पोहतच राहावं म्हणून फक्त हा खटाटोप केलाय... नाना चा लेख खाली कॉपी पेश्ट...त्याचं टायटलं काय होतं ते आता आठवत नाही... रोखठोक नानांच असावं बहुधा...

...................................
       याच्या तेराव्या वर्षी, 1963ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं. रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती. कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता.
      रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई-वडिलांची आठवण यायची. त्यांनी काही खाल्लं असेल का?’ असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.
      अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी.
      नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. कधीतरी अपरात्री घरी परतत असताना फुटपाथवर चाललेला शृंगार पाहताना किळस आणि शिरशिरी एकाच वेळी येत होती. मुलींच्या चेहऱ्यावरून नजर छातीकडे सरकायला लागली होती. पण का कोण जाणे, पोटातली भूक कधी खाली घरंगळली नाही.
      भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो. एकदा जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, ”मी भिकारी नाही.तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई-वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता.
      मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.

     सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो.
     अगदी जेवणाच्या वेळी कसं आहे?” अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे.
माझी सगळयात गोड मैत्रीण भूक
काय नाही दिलं या मैत्रिणीनं?
त्या वयातला तो अप्रतिम प्रवास.
पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं!
सारी शिकवण पोटातून.
      माझ्या पौगंडावस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात.

Comments