सगळ्यांचीच जात...



         हा ब्लॉग अपडेट करताना मज्जा येतेय.  तीन वर्षांपूर्वी केलेला भीमवंदना नावाचा कार्यक्रम पुन्हा करु शकतोस का अशी विचारणा एका मंडळाकडनं झाली आणि जागरण नावाच्या एका काव्यवाचनाच्या ग्रुपच्या आठवणी पुन्हा नव्याने जाग्या झाल्या. त्या मंडळाच्या अध्यक्षाला इतरांना न विचारताच मी नकार देउन टाकला. ह्या मंडळाची एक खासियत आहे. हे लोक शिवजयंती आणि आंबेडकर जयंती एकत्रच साजरी करतात. दोन केक चा खर्च होउ नये म्हणून ही काळजी घेतली जाते, असा माझा एक अंदाज आहे. आणि तो सपशेल चूकीचाही असू शकतो.
       असो...
       तर एका दगडात आंबेडकर आणि शिवाजी यांच्यावर अचूक निशाणी लावणारे हे मंडळ आमचा कार्यक्रम होत नाहीये म्हणून माझ्यावर कमालीचे रागावलेत. त्याचा राग कमी व्हावा म्हणून मी त्यांना शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला हे नाटक आयोजित करण्याचा फुकटचा सल्ला दिला. तर बजेट च्या कारणावरुन आणि नाटकाच्या नादग्रस्त नावाला घाबरुन त्यांनी ते नाटक ठेवण्याचं टाळलं. अद्यापही काही त्यांना कार्यक्रम मिळालेला नाही. मी थोड्याफार प्रमाणात त्यांना दुसरा एखादा कार्यक्रम मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण यश काही आलं नाही.
       २०११ साली लिहीलेलं जस्संच्या तस्सं ठेवलंय. त्यात काही बदल नाही केलेला. फक्त आज अपडेट करताना कार्यक्रमातील एक कविता प्रकर्षाने आठवली. आमच्या कार्य़क्रमाची सुरुवात सामूहिक भीमवंदनेनंतर झाल्यानंतर पहिली कविता माझा परम मित्र विराज चिंदरकर याने सादर केलेली.  कवितेच नाव होतं १४ एप्रिल... 
      १४ एप्रिल तारिख मोठी जबरये..
       युगंधराच्या जन्माची ती खबरये...
      बाकी पूर्वीचा ब्लॉग पुढीलप्रमाणे आहे...त्याचा इन्ट्रो आणि मुळ लेख यांच्यात 'रंगभेद' ठेवलेला आहे...
         आजचा ब्लॉग जरा खास आहे. याची करणही तितकीच दमदार आहेत. कारण नं. १ ब-याच दिवसांनी ब्लॉग लिहीतोय. नंबर २. कितीतरी दिवस विषयाच्या शोधात होतो. विषय तर बरेच होते लिहीण्यासाठी. म्हणजे अगदी अण्णांच्या उपोषणापासना ते पाणी पुरीवाल्याच्या पाण्यापर्यंत ! नं.३ पण मला हे विषय हाताळायचे नव्हते. नं.४ इगो का काय ते म्हणतात, तसं संबोधायला हरकत नाही.
DSCN0017.JPG
कार्यक्रमाच्या वेळचा फोटू
           तारीख मुद्दामून सांगतो..१४ एप्रिल. महामानवाची जयंती ! गोष्ट एका वर्षापूर्वीची आहे. १४ एप्रिल २०१० ला जागरण नावाच्या सो कॉल्ड ग्रुपने या दिनाचं औचित्य साधून एक काव्यवाचनाचा कार्यक्रम उभा केला होता. चार मुलं आणि तीन मुलींचा हा ग्रुप. सगळे मराठीच. सुदैवाने मी पण या ग्रुपमधल्या चार मुलांपैकी एक होतो. माझ्या चुलत बहीणीने या कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी घेतली होती. अमृता तिचं नावं. या वयात साधारणपणे असं काही करेन असं कधीच स्वप्नातही वाटलं नव्हत. हे ज्याच्या मुळे घडलं – त्या निखिल ला थॅक्स. एकाच फोनवर होकार कळवणा-या सर्वेश ला ही थॅक्स. विराज, अमृता तन्वी शामली यांचेही समान आभार. आणि हा कार्यक्रम करायला दिलेल्या निलेश दादा लाही थॅक्स. तास- सव्वा तासाचा हा काव्यवाचनाचा कार्यक्रम. मजा आलेली कराताना. तेव्हाचा एक किस्सा आताच लिहीताना आठवला.
                  
                      कार्यक्रमाचं नाव भीमवंदना. माझं काव्यवाचन तीसरं होतं. कवितेचं नावं होतं चव्हाट्यावर. केशव मेश्राम यांची सोप्या शब्दांतली आणि गाढ्या अर्थाची ती कविता होती. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी मी सगळ्यांना बजावलं होतं की सेल फोन बंद करुन कार्यक्रमाला बसा. आता माइक माझ्या हातात होता. कवितेची पहिली दोन कडवी संपली आणि माझा फोन वाजला. मांडीला गुदगुदी करु लागला. मला वाटलं चव्हाट्यावर आणणार बहुतेक हा फोन. प्रेक्षक घरचेच होते किंबहुना प्रेकक्षच नव्हते ! जास्त टेन्शन नव्हतं. फोन वाजल्या वाजल्या वाचतानाच तो कसाबसा खिशातून काढला आणि स्विच ऑफ पण केला. तन्वी बाजूला बसलेली. तिने हा टेलिकास्ट लाइव्ह पाहिलेला. एखादं वादळ शांत झाल्यासारखं वाटलं. समोर नजर टाकल्यावर पाहिलं  तर कोणालाच काही कळल नाहीये, हे लगेचच लक्षात आलं. आणि वादळासारखी माझी कविताही संपली.
                    निव्वळ १० दिवसांत कविता निवडण्यापासून – रियसल्स् करेपर्यंतचा हा प्रवास आजही स्पष्टपणे लक्षात आहे. आता केलेली मेहनत सादर करायची वेळ आलेली. त्या दिवशी १४ एप्रिल २०१० ला ७ च्या दरम्यान सुरु झालेलं हे काव्यवादळ ८-८.१५ ला संपलं. सगळ्यांनी युजवली करतात तशी स्तुती केली. सुचनाही केल्या. पाळायच्या नसल्या तरी ऐकून घ्याव्याच लागतात त्या ! याला पर्याय नसतो.
                   आता आम्हाला हेच वादळ पुन्हा एकदा नव्या ठिकाणी नव्या दमाने सादर करायचं होतं. तसं ते करायची संधीही मिळाली होती. स्क्रिप्ट मध्ये काही बदल करायचे होते- स्ट्रेटर्जी कशी बदलतात क्रिकेट फुटबॉल मध्ये तसे आमचे हे बदल होते. त्यासाठी मी आणि निखिल विराज भेटलो. वेळ निश्चित करण्यासाठी आम्ही आयोजकांमधील मधल्या माणसाला फोन लावला. तर घडलं काही वेगळंच. घणसोली ला कार्यक्रम मिळालाय, असं कळालं तेव्हा कमरशियल झाल्याचा फिल आला. पण तो जास्त काळ टिकू शकला नाही.
                    असं कळवण्यात आलं की, आम्हाला तिथे कार्यक्रम करता येणार नाहीये. कारणं आमच्यातले कोणीच जय भीमवाले नाहीत. लक्षातच आलं नव्हतं हे आम्हाला ! पण हे उघड सत्य होतं. घणसोलीचा घाव हो लेख वाचला होता सचिन पबव यांचा. तो ही आठवलेला तेव्हा आणि आताही ! आज हे एवढं सगळं लिहीलं कारण याच वादळात एक जात नावाची कविता होती. सर्वेश शिंर्गे याने सादर केली होती ती. सॉलिड नसली तरी मला आवडलेली. वडील आणि मुलगी यांमधील संवाद हा या कवितेचा साचा होता. बाबूराव गायकवाडजींची ही कविता. अजूनही सर्वेश च्या नकळत आम्ही त्याला सगुणा म्हणूनच चिडवतो ! हे त्याला तेव्हाही माहित नव्हतं आणि आताही नसेलंच. ती कविता इथे कॉपी-पेस्ट करतोय. कविता कशी वाटतेय हे तुमच्या जातीपेक्षा तुम्ही ठरवावं इतकींच रास्त अपेक्षा आहे !   
                    जात(बाबूराव गायकवाड)
                                                           सहा वर्षाची चांगुणा दुडू दुडू धावते
तेव्हा तिची चाल मला कळते
वाजवीत नाही ती घुंगखाले
नुसते किलकिले करती डोळे
उमगते तिची मायावी नजर
पेटवून देते एक अज्ञात काहूर
हळूच जवळ येऊन
नजर माझी वळवून
हाताचे बोट धरते
आता तिच्या मान्यातून
सुटणार असतात जीव घेणारे यक्षप्रश्न
पण तिच्या लाद्यवपणाने
पराभूत योध्यासारखे-
आक्रंदते माझे मन
ही म्हणजे, पोर विचारते तर
सांगावा उत्तर!’
मला मात्र इकडे आड तिकडे विहीर
शाळेत तिच्या मैत्रिणी विचारतात- म्हमून
मला ती विचारते - बाबा जात काय असते
ती कधी जाते?’
डोको खाजवत मी उत्तरतो
जात म्हणजे जात
खाणा-यांची जात – देणा-यांची जात
सगळ्यांचीच जात –
जन्मापासून मरणापर्यंत ती बरोबर
असते बेट!’

Comments